नाशिक : जिल्हा
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याबद्दल थेट विधानभवनात तक्रार केली. पुरेसा निधी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याची सूचना त्यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे. नांदगाव मतदारसंघात निधी देण्यासाठी हेतुपुरस्सर टाळाटाळ होत असल्याचा आरोपही कांदे यांनी सीईओ यांना दिलेल्या पत्रात यापूर्वीच केला आहे.
जिल्हा परिषदेच्या ३०५४ आणि ५०५४ या हेडअंतर्गत रस्ते विकासासाठी निधी न मिळाल्याबाबत कांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघात येणाऱ्या नांदगाव तालुक्यातील सुमारे ५० गावांकरिता या दोन्ही हेड अंतर्गत सुमारे साडेनऊ ते ११ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता.
मात्र पावणेसात कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीचे समान वाटपच झाले नसल्याचा दावाही आ. कांदे यांनी केला आहे. उर्वरित निधीसंदर्भात अद्यापही संदिग्धता असल्याने आ. कांदे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी केली आहे. रस्त्यांसाठी मंजुरी असलेल्या कामांकरिता पूर्ण निधी द्यावा. उर्वरित निधीद्वारे नव्या कामांसाठी दीडपट नियोजन करावे. त्यानंतर हा निधी तालुक्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार वितरित व्हावा, या आशयाच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे आ. कांदे यांनी म्हटले आहे. माझ्याच मतदारसंघात निधी देण्यास टाळाटाळ का केली जाते? हे हेतुपुरस्सर नाही का? अशा आशयाचे प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत.