नाशिक : सिन्नर
सुटी घेऊन गावी आलेल्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील जितेंद्र संपत आंधळे या २८ वर्षीय लष्करी जवानाचा काल (दि. २४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे परिसरात अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे खंबाळे गावावर शोककळा पसरली असून, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्र आंधळे हे २३ मराठा बटालियनमध्ये केरळ राज्यात कार्यरत होते.
गुरुवारी रात्री पत्नी ज्योती सात वर्षांचा मुलगा पीयूष, तीन वर्षांची मुलगी आरोही यांना घेऊन ते जवळच असलेल्या मानोरी येथे सासुरवाडीला गेले होते. त्यांना तेथे सोडून गावातीलच साडू ज्ञानेश्वर उत्तम सांगळे यांना सोबत घेऊन ते कामानिमित्त व नातेवाइकांना भेटण्यासाठी नांदूरशिंगोटे येथे गेले होते.तेथून परत येत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळ समोरून चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कारच्या हेडलाईटने डोळे दिपल्याने आंधळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून अपघात झाला. या अपघातात आंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे देखील जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यावर नांदूरशिंगोटे परिसरातच असलेले वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दोघांनाही दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच आंधळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिन्नरला देण्यात दरम्यान, आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची माहिती त्यांच्या लष्करी हेडक्वाटरला देण्यात आली. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूळ गावी खंबाळे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.