August 8, 2026

देवळालीच्या संडे बाजारातील मोबाईल टॉवरला स्थानिकांचा विरोध.

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- येथील संडे बाजाराच्या मध्यवर्ती भागात एअरटेल कंपनी मार्फत टॉवर उभारला जात आहे. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे आठवडे बाजार परिसरातील स्थानिक रहिवाशांना अनेक त्रास, दुष्परिणाम, आजार उद्भवू शकतात असा आरोप करून सदर मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. या संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांना निवेदन देऊन मोबाईल टॉवर इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.nnएअरटेल कंपनीने ट्रायच्या नव्या नियमानुसार देवळाली कॅम्पच्या आठवडे बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू केले होते. गतिशक्ती पोर्टलवरून एअरटेल कंपनीने केंद्र सरकारकडे रितसर मागणी करून तसेच परवानगी घेऊन मोबाईल टॉवरच्या उभारणीचे काम सुरू केले. असे कंपनीचे प्रतिनिधी सागर कापडणीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र सदर मोबाईल टॉवरमुळे अनेक समस्या उद्भवणार असून त्याचा दुष्परिणाम लहान मुले, महिला, वयोवृद्धांना त्रास होणार असल्याची तक्रार आठवडे बाजारातील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच मोबाईल टॉवर उभारणीचे काम थांबवले होते. सोमवार दि. ४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळांने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांची भेट घेऊन त्यांना तक्रारीचे निवेदन दिले. यावेळी एअरटेल कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. स्थानिकांनी आपल्या व्यथा, तक्रारी, टॉवरमुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गजभिये यांना माहिती दिली. डॉ गजभिये यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंका, कुशंका, समस्या निवारण करून त्यानुसार सुसंवादातून सदर विषय मार्गी लावावा त्याच प्रमाणे सर्वांच्या संमतीने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, असे सुचवले. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी सागर कापडणीस व शिष्टमंडळ हे संयुक्तरीत्या पर्यायी जागेची पाहणी करून मोबाईल टॉवर इतरत्र कसा उभारता येईल यावर निर्णय घेतील असे ठरवण्यात आले. तसेच कंपनीच्या वरिष्ठांना याबाबत जनतेच्या भावना कळवून त्यांचाही निर्णय विचारात घेतला जाणार आहे. यावेळी शिष्टमंडळात फारुक शेख, विनय गवळी, करण गवळी, निलेश बंगाली, शुभम चौधरी, अंबादास गवळी, रोनाल ब्राऊन, राजेश कनोजिया यांचा समावेश होता. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनावर पूजा कनोजिया, शीला ब्राऊन, सुनिता चौधरी, कमला कनोजिया, सहिरा अहमद, तनजिम खान, संगीता वाघमारे, जोशना कनोजिया, सुरेखा लव्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. भाजपचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी सांगितले की प्रगती, विकास कामे करण्याचे स्वागत आहे. मात्र लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. आम्ही स्थानिक रहिवाशांच्या सोबत आहोत. त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *