संविधानाच्या अवमाना निषेधार्थ नाशिकमध्ये उद्या विराट जनआक्रोश मोर्चा
अनिल आठवले संपादक रिपब्लिकन न्यूजnnनाशिक : भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या तसेच संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळणाऱ्या, मनुवादी प्रवृत्तींच्या विरोधात नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा उद्या बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होणार आहे. सदर मोर्चा नाशिक रोड पासून पुढे-बिटको पाॅंइट-उपनगर-द्वरका-सारडा सर्कल-शालीमार ते सीबीएस जवळील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे. यांची नोंद सहभागी होणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी घ्यावी असे आयोजकांनी सूचित केले आहे.nnप्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा गौरव करणारा दिवस आहे. मात्र भाजपच्या काही लोकप्रतिनिधी व सत्ताधारी प्रवृत्तीकडून संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. असे करणाऱ्या प्रवृतींच्या विरोधात समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.nnतसेच २६ जानेवारी रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी एकमुखी मागणी संयोजकांची आहे. मंत्री निलेश राणे नाशिकसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून संविधानिक मूल्यांचा अवमान करीत हसतात. त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ वगळण्यात यावे, ही देखील मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेच्या नावाखाली तपोवन परिसरात वृक्षतोडीचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप नाशिककरांचा असून, ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.nnया सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या जनआक्रोश महामोर्चामध्ये भारतीय संविधान आणि शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.nnभारतीय संविधान हे कोणत्याही एका जाती-धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे नसून संपूर्ण भारत देशाचे आहे. संविधानाचा अवमान म्हणजे सार्वभौम राष्ट्राने स्वीकृत केलेल्या लोकशाही मूल्यांचा अवमान आहे. त्यामुळे प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.nnहा महामोर्चा शांततेने आणि शिस्तबद्ध व लोकशाही मार्गाने संपन्न होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिककर निर्मित ‘आम्ही भारताचे लोक’ या समितीतर्फे करण्यात आले आहे.
