नाशिक : जिल्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची काविळ झाली आहे.
मालेगावी होणाऱ्या उद्धव ठाकरे च्या सभेस लाखोंची गर्दी होणार त्यांना दिसणार नाही,असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.विनायक राऊत यांनी लगावला.
विनायक राऊत सोमवारी (दि २१) नाशिक दौऱ्यावर आले असता . शालिमार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.रविवारी एकनाथ शिंदे यांची सभा अत्यंत निरस झाली.त्यांचे भाषण जणू पोपटपंची होते.कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिले आणि ते फक्त वाचण्याचे काम करीत होते असेच दिसले आणि त्यामुळेच लोक उठून जात होते.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही 100 टक्के भरपाई देऊ.कोकणात रविवारी सभा घेतली
इकडून तिकडून लोकं गोळा केले. तुम्ही सगळीकडे शासकीय विमानाने जाऊन एक तास निरास भाषण करता.पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तुमच्याकडे वेळ नाही.शासकीय कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पण होत नाहीत मग त्यांना मदत कधी करणार.किसान मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.त्याच्या कुटुंबाना अर्थसाहाय्य ते करू शकले नाहीत.खोके द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत मात्र मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तसेच शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. 24 तासांच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे,असेही राऊत यांनी राज्य सरकारला ठणकावले.
नीलेश राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता तो आमच्या गिनतीतच नाही अशी खिल्ली राऊत यांनी उडवली.ईजा,बिजा झाला.आता तिजा म्हणजे तिसऱ्यांदा आणि तेसुद्धा 2ते 3 लाखांच्या फरकाने आपटायचे असेल तर खुशाल त्याने आमच्याविरुद्ध लढावे त्यांच्या पराभवाला आमच्या शुभेच्छा,असे राऊत यांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली होती.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात वसले आहेत.त्यामुळे त्यांचा उल्लेख आम्ही कसा करायचा ते या बेईमान लोकांनी आम्हाला शिकवू नये,असा टोलाही विनायक राऊत यांनी शिंदे गटाला लगावला
पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,विलास शिंदे डी.जी.सूर्यवंशी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.