नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येने मोबाईल, एक्सेसरीज, विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहेत. याठिकाणी मागील काही वर्षात काही राजस्थानी मंडळी मोबाईल कव्हर आणि स्क्रिन गार्ड विक्रीच्या अनुषंगाने दाखल झाली. हळूहळू या लोकांनी होलसेल, रिटेल, एक्सेसरीज विक्रीत बस्तान बसवले आणि मराठी माणूस मागे पडू लागला… मात्र मोबाईल रिपेरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत. हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपला गुजराना चालवत असतात. मात्र, मागील काही दिवसापासून राजस्थानी दुकानदार, होलसेलर यांनी मराठी माणसाची अडवणूक करायला सुरुवात केली.
कळस तर तेव्हा गाठला जेव्हा मोबाईल रिपेरिंग करण्यासाठी लागणारे एक्सेसरीज आणि साहित्य, त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः राजस्थानी मंडळींकडे गेला आहे त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली. त्यांनी अंतरंगात मिटिंग करून मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच केला. यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली होती.
याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. मनसेने यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली तसेच राजस्थानी दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली