नाशिक : मंगळवारी दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे असतानाच प्रत्यक्षात मात्र सायंकाळपर्यंत एक थेंबही कोसळला नाही.
गेल्या आठवड्यात वादळी वार्यासह जोरदार अवकाळी पावसाने शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली होती. शेतात पिके नसली तरी बर्याच ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली होती. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मंगळवारी सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. घर तसेच कार्यालयांमध्ये पंख्यांची घरघर सुरू होती. दुपारनंतर आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली. जोरदार पाऊस पडेल, असे चित्र निर्माण झाले होते. काही ठिकाणी जोरदार वारा सुटला होता. केवळ शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पावसाची शक्यता बघून कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक घरी परतण्यासाठी घाई करीत होते. सायंकाळी सहापर्यंत काळेकुट्ट वातावरण कायम होते. तोपर्यंत पावसाचा थेंबही कोसळला नव्हता. दरम्यान, यंदा पाऊस आणि पिक सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनही वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे.
अवकाळी नंतर शेतक-यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून रविवारी (दि. 19) अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यातील अवकाळी ओसरेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी आनंदाची बाब आहे.
दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात 19 मेच्या आसपास दाखल होत असतो, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून 1 ते 1.5 किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणा-या वा-यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते.
पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान -निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत: 21 मेपर्यंत अंदमानची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.
जाहीर सभा संकटात
लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा टप्पा असून प्रचार शिगेला पोहचला आहे. उद्या (दि.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वणी येथे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे यांनी अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पावसाचे वातावरण कायम राहिल्यास या तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभांवर पाणी फेरण्याची शक्यता आहे.