HomeCrimeशहरात “नो टॉलरन्स टू क्राइम” मोहीम....

शहरात “नो टॉलरन्स टू क्राइम” मोहीम….

नाशिक | वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस आयुक्त‌ कर्णिक यांचे कठोर पाऊल, शहरात “नो टॉलरन्स टू क्राइम” मोहीम सुरू

नाशिक शहर हे राज्यातील वेगाने विकसित होणारे आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरी, घरफोडी, साखळी ओढणे, अंमली पदार्थांची विक्री, खंडणीखोरी आणि टोळी युद्धाच्या घटना वाढल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढलेला गुन्हेगारीकडे झुकाव, तसेच बाहेरील गुन्हेगारांचे शहरात वाढते अस्तित्व, ही पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक् संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार शहरातील संवेदनशील आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भागांमध्ये विशेष नाकेबंदी, रात्री गस्त वाढविणे आणि संशयितांच्या तपासणीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पोलीस आयुक्तांनी “नो टॉलरन्स टू क्राइम” ही स्पष्ट भूमिका घेत, प्रत्येक गुन्हेगारी घटनेवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अंमली पदार्थ विक्रेत्यांवर, अवैध दारू विक्रेत्यांवर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अलीकडेच केलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मादक द्रव्ये, हत्यारे आणि चोरीचा माल जप्त केला आहे. अनेक कुख्यात गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

खंडणी अपहरण प्रकरणात रामदास आठवले गटाचे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष  प्रकाश मोगल लोंढे , दीपक प्रकाश लोंढे या संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच गुन्ह्यातील एक संशयित भुषण प्रकाश लोंढे सध्या फरार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिले आहे .तर सराईत खंडणीखोर बागुल टोळीचा मोरक्या अजय बागुल याच्यावर सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस अजय बागुलचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे जेलरोड येथील शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी पवन पवार यांच्यावर अवैदरीत्या बॅनरबाजी केल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोधही पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी शहरातील गुंडगिरी विरोधात कंबर कसल्या असून आता नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्याचा पन नाशिक पोलिसांनी घेतला आहे.

शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक विभागीय अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवली असून, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आहेत. “पोलीस तुमच्या दारी” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियानाद्वारे तरुणांना गुन्हेगारीच्या मार्गावर न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नाशिक पोलिसांनी अलीकडच्या काळात अनेक टोळ्यांवर कारवाई करून शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे. गुन्हेगारी नियंत्रणासोबत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही विशेष मोहीम सुरू आहे. दैनंदिन जीवनात पोलिसांची उपस्थिती नागरिकांना अधिक सुरक्षित वाटावी यासाठी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून गस्त सुरू केली आहे.

पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे की, “नाशिक शहरात गुन्हेगारीला जागा नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि नागरिकांचा विश्वास राखणे हे आमचे प्राधान्य आहे.” त्यांच्या या धोरणामुळे शहरातील नागरिकांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

एकूणच, नाशिक पोलीस दल वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाले असून, आयुक्तांच्या नेतृत्वाखाली “कायदा आणि सुव्यवस्था” राखण्यासाठी सर्व पातळीवर कार्य सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून सहकार्य केल्यास, नाशिक शहर पुन्हा सुरक्षित आणि शांततेचे केंद्र बनेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!