आ. सरोज अहिरेंच्या उपस्थितीत भूमि अभिलेख कार्यालयात बैठक संपन्न
नाशिक ।
नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत नगर भूमापन करतांना सातबारा उतारा व सिटी सर्वे यात मोठ्या प्रमाणात तफावत व चुका आढळून आल्या आहेत, शेतक-यांच्या मागणी नुसार चुका दुरुस्त करण्यासाठी आ. सरोज अहिरेंच्या उपस्थितीत भूमि अभिलेख कार्यालयात बैठक संपन्न झाली असून शासनाच्या आदेशाप्रमाणे तातडीने रेकाॅर्ड दुरुस्त करण्यात येणार असल्याने महानगरपालिका हद्दीतील 17 गावच्या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दीत 2001 ते 2018 या कालावधीत समाविष्ट झालेल्या 17 गावातील जमिनीच्या सातबारा उतारा व सिटीसर्वे रेकाॅर्ड मध्ये मोठ्या तफावती आढळून आल्या होत्या, यामुळे स्थानिक शेतक-यांना मोठ्या समस्या निर्मा्ण झाल्या होत्या, जमिनीचे रेकॉर्ड दुरुस्त होण्यासाठी आ. सरोज अहिरे यांनी गेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शासनाच्या लक्षात आणून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती, त्यानुसार महसूल विभागाकडून तातडीने जिल्हा प्रशासनाला आदेश काढण्यात आले होते.
शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी दि. 11 रोजी आ. सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिक्षक हेमंत सानप यांच्या कार्यालयात भूमापन अधिकारी राजेश नितनवरे, उप अधिक्षक बिपीन काजळे आदीं अधिकारी, माजी नगरसेवक पंडित आवारे, बाजीराव भागवत, विक्रम कोठुळे, चंद्रकांत कोंबडे, तानाजी गवळी, विष्णुपंत गवळी, खंडू धोंगडे, संजय हांडोरे, त्र्यंबक पोरजे, सुनील धूर्जड, दत्ता ढेमसे, लहानु गवळी, शांताराम चुंबळे, लहानु चुंबळे, त्र्यंबक कोंबडे, आदी उपस्थित होते.
विहितगाव, चेहेडी व पाथर्डी या गावातील प्रकरणांची संख्या अधिक असून 17 गावांतील हजारो शेतक-यांचा प्रश्न असून तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ. आहिरे यांनी प्रशासनाला केल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.