नाशिक लोकल वृत्तसेवा
र्ीनाशिक : आपली सेवा हेच जीवनाचे लक्ष्य आहे. गेल्या दोन कार्यककाळात आपण माझे काम पाहिले आहे. आता पुन्हा तिसर्या कार्यकाळासाठी, विकसित भारत बनविण्यासाठी आपले आशीर्वाद मागायला आलो आहे, असे भावनिक आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांचा जागेवा मागतानाच काँग्रेससह शिवसेनेवर (ठाकरे गट) सडकून टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसशी पार्टरनरशीप करणार्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याची वेळ आली असून, जनता जनार्दन ते मतांतून दाखवून देतील असेही ते म्हणाले.
दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक दौर्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. राहुल आहेर, नाशिक मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, माजी आमदार धनराज महाले, विजय साने यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे शहर-जिल्हा पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते. नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते पाऊण तास उशिराने आलेल्या नरेंद मोदी यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी जय शिवाजी असा तीन वेळा गजर केला. मराठीतून संवाद साधताना त्यांनी जनमाणसांवर प्रभाव टाकत माता सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकराजांना नमन केले. भाषणाच्या सुरूवातीपासूनच मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीकेची तोफ डागण्यास सुरूवात केली. काँग्रेसवर तोंडसुख घेताना त्यांनी शिवसेनेला (ठाकरे गट) नकली शिवसेना असे संबोधले.
आज बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण येत असल्याचे स्पष्ट करीत मोदी यांनी काँग्रेससोबत गेलेली शिवसेना ही नकली शिवसेना असल्याचे वारंवार सांगितले. ज्या बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसच्या विचारांचा पुरस्कार करण्याचाही विचारही केला नाही त्याच काँग्रेसबरोबर नकली शिवसेना गेल्याचे सांगितले. बाळासाहेब म्हणत असे की काँग्रेसचा पुरस्कार करण्यापेक्षा शिवसेना बंद करेल. आज त्यांचे पुत्र काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचत असून, पापाचे भागिदार झाले आहेत. याचे सर्वात जास्त दु:ख स्व. बाळासाहेबांना होत असेल, असेही मोदी म्हणाले. बाळासाहेबांचे अनेक स्वप्न होते. ते भाजपने पूर्ण केले असे ठणकावून सांगताना नकली शिवसेनेमुळे त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला असल्याचेही मोदी म्हणाले. राज्यातील जनतेच्या भावनांशी खेळणार्या या नकली शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती वेळ आलेली असून, त्याची क्षिा नकली शिवसेनेला मिळेल, असेही मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना व्होट बँक बनविण्यासाठी काँग्रेस बजेटचे तुकडे करू पहात आहे; परंतु मोदी धर्माच्या नावाखाली बजेट वाटू देणार नाही.
यावेळी बोलताना मोदी यांनी भाजपाने दहा वर्षात केलेल्या कामांचे विविध दाखले देत गोडवे गायिले. शेतकरीहिताची कामे भाजप सरकारने केल्याने मोदींनी ठणकावून सांगितले. भाजप शेतकरी हिताला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. शेतकर्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 12 हजार रुपये भाजपने जमा केले. ते पुढेही निरंतर राहणार असून, भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षात शेतकर्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयेप्रमाणे 60 हजार रुपये मिळणार असल्याची मल्लीनाथी मोदी यांनी केली. यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री तथा दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याही कामाचे गुणगान केले. पवार-गोडसे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना यंदा रेकार्ड ब्रेक मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना संसदेत पाठविण्यासाठी मदत करा, असेही शेवटी मोदी म्हणाले. 20 ते 22 मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी भाजप सरकारने केलेल्या कामांचे गोडवे गात काँग्रेस आणि शिवसेनाच (ठाकरे गट) लक्ष्य केले. मोदी यांच्या जाहीर सभेला नागरिकांची चांगली गर्दी असली तरी गेल्या वेळेचा जोश मात्र यंदा मोदी यांच्या भाषणात जाणवला नसल्याची चर्चा होती.
गंगापुत्र मोदी विकासगंगा खेळवतील
लोकसभेच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त करताना पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी वळविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी मोदी यांचा गंगापुत्र म्हणून उल्लेख करताना राज्याचा, देशाचा विकास साधण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. येथे कांद्याचा वांदा होतो. त्यासाठी नवीन मॅकॅनिझम तयार करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. हे मॅकॅनिघम आल्यावर शेतकर्यांची कांद्याची अडचण कायमस्वरूपी दूर होऊ शकेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीका करताना ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. यावेळी छगन भुजबळ, दादा भुसे, राधाकृष्ण विखे आणि गिरीश महाजन यांनीही मनोगत व्यक्त करीत मोदींसह भाजपच्या कामांचे गोडवे गायले.