नाशिक मधल्या वंचित बहुजन आघाडी मध्ये असं काय घडलं की 200 कार्यकर्ते एकदाच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी नाशकातून बाहेर पडले. ऐन निवडणुकीच्या काळात नाशिक मधल्या वंचित बहुजन आघाडी मध्ये असं काय घडतं की निवडणुकीच्या तोंडावरच कार्यकर्ते वंचित मधून बाहेर पडतात. याचं आत्मपरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी करायला हवे. फेब्रुवारी 2024 ला खासदारकी निवडणुकीत वंचित ने पवन पवार यांना उमेदवारी देऊन पवन पवार यांचा दणकावून पराभव झाला तर नोव्हेंबरच्या आमदारकीत मराठा समाजाचे आयात उमेदवार करण गायकर यांना उमेदवारी देण्यात आले होते तर पक्षाचे एकनिष्ठ असे अविनाश शिंदे यांना याच निवडणुकीत उमेदवारी देण्यात आले होते मात्र या दोघांचाही दारुण पराभव वंचितला स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीवर अनेक पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी टीका केल्या. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवर पैसे घेतल्याचेही आरोप झाल्याची माहिती यावेळेस अनेक कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. नाशिक मधले हे दोन्ही पराभव वंचितला पचवता आले नाही म्हणून पवन पवार यांनी शिवसेनेत उडी मारली आणि पक्ष सोडला. पवन पवार यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा हात धरला तर याआधी पवन पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सक्रिय काम करण्याचे फोटो ही व्हायरल झाले. आमदारकीच्या पराभवानंतर अविनाश शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला.
वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एकाच वेळी तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले पद व सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे पक्षात अक्षरशः भूकंप झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी संघटनात्मक कामकाज, पक्षातील गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे नाराज होते. कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे पक्षाच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अखेर आज या सर्वांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन पक्षाला “सोडचिठ्ठी” दिली.
https://www.facebook.com/share/v/1CrzKL7kfw/
यामध्ये माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते संजय साबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल, भारिप बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख अनिल आठवले, माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीज सचिव किशोर महिरे आदींचा प्रमुख सहभाग असून त्यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्ते राजीनामा सादर करण्यासाठी पुढे आले आहेत.
कार्यकर्त्यांच्या मते, “पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर सुरू केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना पूर्णपणे दुय्यम वागणूक दिली जाते. पक्षातून काढून टाकण्याची सर्रास पणे धमकी दिली जाते आम्ही विचारसरणीशी निष्ठावान आहोत, परंतु अशा अन्यायकारक वातावरणात काम करणे शक्य नाही,” असे ते म्हणाले.
महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या मोठ्या बंडामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक सामर्थ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक सारख्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणे ही पक्षासाठी अत्यंत धोक्याची घंटा ठरू शकते.
राजीनामे सादर करताना उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले की, “आम्ही वंचितांच्या हक्कासाठी लढत राहू पण स्थानिक अन्यायकारक आणि हुकूमशाही वृत्तीच्या नेतृत्वाखाली नव्हे.”
नाशिक जिल्ह्यातील या घडामोडींमुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर दबाव वाढला असून पुढील काही दिवसांत या राजीनाम्यांच्या लाटेचा परिणाम राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.