महाराष्ट्रात ‘रोख भिक्षा बंद’ चळवळीची सुरुवात
अन्न-पाणी द्या, पण पैसे नकोत; भिक मागण्याच्या माफियांविरोधात नागरिक एकत्र असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते संतोष पिले यांनी केले आहे.
महाराष्ट्रभर आजपासून ‘रोख भिक्षा देणे बंद’ करण्याची अनोखी जनचळवळ सुरू झाल्याचा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या उपक्रमानुसार भिक मागणाऱ्या व्यक्तींना अन्न व पाणी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र रोख स्वरूपात एकही रुपया देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये या मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्त्री, पुरुष, वृद्ध, अपंग किंवा लहान मूल—कोणतीही व्यक्ती भिक मागत असेल तर तिला अन्न व पाणी द्यावे; पण पैसे देऊ नयेत, असे या संदेशात नमूद आहे.
या उपक्रमामागील उद्देश भिक मागण्याच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कथित माफिया साखळ्या मोडीत काढणे हा असल्याचे सांगितले जाते. तसेच बालअपहरण आणि गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी आपल्या वाहनात बिस्किटांचे दोन पाकिटे ठेवावीत आणि गरजूंना अन्न द्यावे, मात्र रोख मदत टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी संदेश किमान दहा जणांना व तीन गटांमध्ये शेअर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ही मोहीम राजस्थानमध्ये यशस्वी ठरल्याचा दावा संदेशात करण्यात आला आहे. तथापि, संबंधित मोहिमेबाबत अधिकृत शासकीय घोषणा किंवा परिपत्रक उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन गरजूंना मदत करताना सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.